श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या बाबतीतल्या सध्याच्या न्यायालयीन परिस्थितीचा संपूर्ण आढावा आणि मागोवा


जसे भगवान श्रीकृष्ण निजधामी गेल्यानंतर अर्जुनाला विरहाच्या दुःखाने मोठी विकलांग अवस्था प्राप्त झाली होती तीच परिस्थिती परमपूज्य गुरुदेवांच्या महानिर्याणानंतर इथल्या भक्तवर्गाची झाली होती.

अशा परिस्थितीत काही वाईट व बाह्य शक्तींनी भक्तांच्यात वितंडवाद निर्माण करून तात्त्विक मतभेदांचे रूपांतर कायदेशीर लढाईत करवून घेतले आणि देवस्थान ट्रस्टची घडी विस्कटवून टाकली.

वास्तविक पहाता परमपूज्य गुरुदेवांनी ह्या ट्रस्टचे संस्थापक म्हणून जी घडी घालून दिली होती ती मोडायचे कोणतेही कारण नव्हते किंबहुना असे कृत्य आपोआपच बेकायदेशीर ठरणार होते.

परंतु 'विनाशकाले विपरीत बुद्धी' ह्या न्यायाने सन २००३ पासूनच त्या काळच्या विश्वस्त मंडळाची पावले चुकीच्या दिशेकडे ओढली गेली व घराण्याच्या विश्वस्तास विश्वस्त मंडळातून काढून टाकण्याची बेकायदेशीर कृती त्या काळच्या विश्वस्त मंडळातर्फे केली गेली.

यथावकाश, म्हणजे सन २०१० साली ह्या न्यायिक प्रकरणाचा निकाल लागून न्यायालयातर्फे ही कृती चुकीची आणि बेकायदेशीर ठरविली गेली.

मात्र तरीही त्या काळातील अनधिकृत विश्वस्त मंडळांनी आपला हेका चालूच ठेऊन कायद्याला न जुमानण्याची वृत्ती अंगिकारली.

पुढे, म्हणजे सन २०१४ साली तर त्या काळातील अनधिकृत विश्वस्त मंडळाने परमपूज्य गुरुदेवांनी केलेली देवदेवतांच्या पूजाअर्चेची व्यवस्था देखील भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला.

परंतु जागरूक आणि गुरुदेवांशी एकनिष्ठ असणाऱ्या एका मोठ्या भक्तवर्गाने हा प्रयत्न देखील हाणून पाडला.

शेवटी, सत्याचाच विजय होतो! 'सत्यमेव जयते' ह्या न्यायाने तथाकथित अनधिकृत अशा विश्वस्त मंडळांपैकी बहुतेक सर्व विश्वस्तांचे बदल अर्ज फेटाळून लावले गेले आणि त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून घराण्याचे विश्वस्त श्री मिलिंद गोविंद क्षीरसागर ह्यांनी सन २०२१ साली नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना केली.

अशा प्रकारे सुमारे अठरा वर्षे चाललेला हा लढा आता पूर्णतः यशस्वी होताना दिसतो आहे.

नवीन विश्वस्त मंडळाने सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून गेल्या अनेक वर्षांत ट्रस्टमध्ये घडलेल्या अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांचा आढावा घेऊन ट्रस्टचे स्पेशल ऑडिट करून घेण्यासाठीचा अर्ज सक्षम न्यायालयात दाखल केलेला असून लवकरच त्यावर निकाल अपेक्षित आहे.

आता विश्वस्त मंडळाने सर्व कार्यकर्त्या भक्तांना असे आवाहन केले आहे की न्यासाच्या व्यवस्थापन विषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी कायदेविषयक बाबींचे ज्ञान, अनुभव आणि रस असलेल्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन स्वयंसेवक म्हणून ह्या कार्यात उतरावे.

ह्या न्यायालयीन लढाईचा इतिहास फार मोठा असून त्यात अनेक बारकावे व खूप मोठी गुंतागुंत आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाने ह्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा ग्रुप बनविण्याचे ठरविले असून त्या मार्फत पुढील कार्य होणे अपेक्षित आहे.

न्यासाला ह्या व्यवस्थापन विषयक सेवा देण्यात रस असलेल्या कार्यकर्त्या स्वयंसेवकांनी कृपया विश्वस्त मंडळाशी त्वरित 'संपर्क' साधावा म्हणजे त्यांना ह्या कार्यात सहभागी करून घेणे सोपे जाईल.